पुण्यात फ्लेक्स,बॅनर काढण्याला आणि बोर्ड रंगवण्याला महापालिकेची सुरूवात
पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी पाच वाजल्यापासून लागल्याने महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. राजकीय पक्षांचे फ्लेक्स, बॅनर, झेंडे काढण्याला सुरूवात केली असून, स्थायी स्वरूपात लावलेल्या बोर्डांवरही स्टिकरिंग करण्याला सोमवारपासून सुरूवात केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी वार्ताहर परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण देशभरात चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार असून, पुण्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी त्यांच्याशी संबंधित जाहिररित्या लावण्यात आलेल्या गोष्टींवर महापालिकेने कारवाई करण्याला सुरूवात केली आहे. राजकीय पक्षांनी किंवा राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनी शहरभर वाढदिवस, शुभेच्छा, अभिष्टचिंतन, नियुक्त्या, जाहीर कार्यक्रम, सण समारंभांचे बोर्ड, दुरुस्त्या, निधीतून केलेल्या कामांचे बोर्ड, नामफलक, दिशादर्शक, सोसायट्यांमधील बंगल्यांची नावे असलेले एकत्रित बोर्ड खाली असलेली सौजन्यांवरील नावे, बॅनर, फ्लेक्स, विविध वस्तूंचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, लकी ड्रॉ, हळदीकुंकू समारंभाचे बोर्ड, अन्य सौजन्यावरील नावे, बॅरीकेडस, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेले बेंचेसवरील नावे, वाचनालये, उद्घाटन समारंभ, अनावरण, कोनशिला, स्वच्छ सर्वेक्षणातून रंगवलेल्या भिंतींवरील माननीयांची नावे, पक्षाचे चिन्ह, तसेच चिन्हाशी साधर्म्य असलेले चिन्ह यांचा यामध्ये समावेश आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे ही कारवाई करण्यात येते. विभागाने 15 क्षेत्रीय कार्यालयांना या संदर्भात आदेश दिले असून, क्षेत्रीय कार्यालयांनी या कामासाठी दोन-तीन पथके नेमली आहेत. या पथकांकडून ही कारवाई केली जात आहे. तात्पुरत्या स्वरूपात लावलेले फ्लेक्स, बॅनर काढून टाकले जाणार आहेत, तर अन्य स्थायी स्वरूपातील स्ट्रक्चर किंवा बोर्ड स्टीकरच्या सहाय्याने झाकून टाकले जाणार आहेत.
स्वच्छ भारत सर्व्हेक्षणांतर्गत रंगवलेल्या भिंतींवर माननीयांनी स्वत:ची नावे “संकल्पने’च्या माध्यमातून लिहिली आहेत. ती नावे ज्या रंगांनी काढली आहेत त्याच रंगांचा वापर हे घालवण्यासाठी केला जाणार आहे. यामुळे जे काही “पेन्टींग’ आणि “सुशोभिकरण’ केले आहे, ते विद्रुप होऊ नये हा यामागचा उद्देश्य असल्याचे आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले.