कोंढवा परिसरात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू
पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) - पावसाच्या आगमनानेच १५ जणांचा बळी जाण्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. शहरातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून हे मृत्यू तांडव घडले आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृत मजूर इमारत बांधकामासाठी पुण्यात वास्तव्य करत होते. मध्यरात्री 1.30 च्या सुमारात ही दुर्दैवी घटना घडली. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१) आलोक शर्मा (वय-२८), २) मोहन शर्मा (वय-२०), ३) अजय शर्मा (वय-१९), ४) अभंग शर्मा (वय-१९), ५) रवि शर्मा (वय-१९), ६)लक्ष्मीकांत सहानी (वय-३३),७) अवधेत सिंह (वय-२२), ८) सुनील सिंग(वय-३५), ९) सोनाली दास (वय-२), १०)ओवी दास (वय-६), ११)विमा दास (वय-२८) १२) पूजा देवी(वय २८) अशी समोर आलेली नावं आहेत. एकूण पंधरा जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
कोंढवा परिसरात असणाऱ्या आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाजूला सुरु असलेल्या निर्माणधीन इमारतीच बांधकाम सुरु होतं त्याठिकाणी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीत पार्किंगला असणाऱ्या 4 गाड्याही खाली कोसळल्या.