
मुक्काम हेमलकसा
लग्न झाल्याच्या दुसर्याच दिवशी आम्ही ताडोबाला गेलो. नंतर तिथून आलापल्ली-भामरागडकडे. तिथेच एक रात्र मुक्काम केला. तिथल्या फॉरेस्ट-ऑफिसरना आम्ही लग्न झाल्या झाल्या जंगलात आलो आहोत आणि इथेच काम करणार आहोत, या गोष्टीचं फार कौतुक वाटलं. लग्नाच्या आधी मंदाने ही जागा पाहिली नव्हती. मी कल्पना दिली होती; पण प्रत्यक्ष काम कोणत्या परिस्थितीत करावं लागेल याचा अंदाज तिला लग्नानंतरच आला. मंदाने आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथे त्या वेळी बर्याच सुधारणा झाल्या होत्या. हे प्रकल्प शहराच्या जवळही होते. हेमलकशालाही असंच काही तरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं नव्हतं. तरी ती शांत होती.
लग्न झाल्यावर आणि ताडोबा-भामरागडला फिरून आल्यावर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ 'अशोकवन' नावाचा आणखी एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प होता. आम्ही तिथे राहिलो. तिथूनच नागपूरला ये-जा करायचो.
अनेकजणांना नकार देऊन मंदाने माझ्याशी लग्न केलं, याचा परिणाम मात्र मला पुढे भोगावा लागला. झालं असं, की मंदाने लग्नाआधी पहिला हाऊस जॉब मेडिकलला सर्जरीत केला होता. तिथल्या सर्जनची इच्छा होती, की तिने आपल्या एका विद्यार्थ्याशी लग्न करावं. ते दोघंही तेव्हा एकाच वॉर्डात काम करत होते. मंदाने त्याला नकार दिला. ते सर्जन तिच्यावर सक्ती तर करू शकले नाहीत, पण तो राग त्यांनी माझ्यावर काढला. माझा हाऊस जॉब संपून मी जेव्हा 'नागपूर मेडिकल कॉलेज'ला रजिस्ट्रेशनसाठी गेलो तेव्हा ते तिथे होते. त्यांनी सरळ मला प्रवेश नाकारला. नकाराला कारण काहीच नव्हतं. बाराजणांना प्रवेश मिळणार होता, आणि त्यात माझा नंबर पाचवा होता. तरीही त्यांनी त्यांच्या अखत्यारीत मला प्रवेश दिला नाही. हा माझ्यावर सरळ सरळ अन्याय होता. त्या वेळेस मला बर्याचजणांनी कोर्टात दाद मागायचा सल्ला दिला; पण मी तसं केलं नाही... कोर्टात निर्णय माझ्या बाजूने होईल याची खात्री असूनही. एक तर मला या प्रकारे प्रवेश मिळाला असता, तरी त्यांच्याच हाताखाली काम करायचं असल्याने त्यांनी त्रास दिलाच असता. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मी पोस्टग्रॅज्युएशन करत होतो. ती हेमलकशाची जागा अजून ताब्यात आली नसल्याने मी पुढे काय करणार हे ठरवलेलं होतं. त्यामुळे कोर्ट-कचेरीसारख्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं.
नागपूरलाच 'इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज' होतं. मेडिकल फॅकल्टीचे डीन डॉ. दशपुत्रे यांना भेटून मी त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी मला प्रवेश द्यायचं कबूल केलं. पण तिथली रजिस्ट्रारची जागा फक्त स्थानिक लोकांसाठी होती. त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येणार नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त इतर विद्यार्थी ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. मला हे पसंत नव्हतं; पण माझ्यापुढे पर्याय तरी काय होता?
दरम्यान, मंदाने तिचं शिक्षण संपल्यावर 'गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज'मध्ये नोकरी सुरू केली. तेव्हा तिला ८५० रुपये पगार होता. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता मात्र वाढत होती. हेमलकशाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. पण माझ्या सुदैवाने याच सुमारास हेमलकसा व नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं आणि माझा मार्ग खुला झाला.
आनंदवनातून हेमलकसा होतं अडीचशे किलोमीटरवर. रस्ते अगदीच खराब होते. काही ठिकाणी तर रस्तेच नव्हते. त्यामुळे तिथे जायला तब्बल एक दिवस लागायचा. वाटेत नदी आणि ओढेही होते. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा वेळी अडकून बसायला होणार. म्हणून वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून आम्ही 'नागेपल्ली'ची जागाही मागितली होती.
जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकडून मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकशाला जाऊन धडकले. २३ डिसेंबर १९७३ या दिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच दिवशी 'लोकबिरादरी प्रकल्पा'च्या कामाचा खर्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच. पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. "तू तुझ्या वेळेला ये - मी कामाला सुरुवात करतो," असं म्हणून ते तिथे पोहोचले. पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झालं.
हेमलकशाची जागा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना, म्हणजे 'महारोगी सेवा समिती'ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फुरण चढलं होतं. ज्या कार्यकर्त्यांना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी - वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली. झाडं तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी "तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात?" असा आक्षेप घेणं सुरू केलं. बाबा म्हणाले, "कागदोपत्री जागा माझी आहे." त्यावर ते म्हणाले, "पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही." ते ऐकेनात. त्यामुले मोठा पेच निर्माण झाला.
खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकार्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पना द्यायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्याने तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. "झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा," असं त्यांनी वनाधिकार्याला सुचवलं. वनाधिकार्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किंमत ठरवली. तेवढी रक्कम दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं.
हेमलकशाची जागा मिळाली तेव्हा मी नागपुरात शिकत होतो. पण जागा मिळेपर्यंत वेळ काढण्यासाठीच मी शिकत असल्याने जागा ताब्यात आल्याचं कळल्यानंतर मी माझं शिक्षण सोडून हेमलकशाला जायचं ठरवलं. नागपूरच्या कॉलेजमध्ये मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता, त्यामुळे हेमलकशाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असतानाही ती सोडून मी हेमलकशाला जायचा निर्णय घेतला. या निर्णयाचं बाबांना खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा आणि मग हेमलकशाला यावं असं त्यांना वाटत होतं. तेव्हा ते काही बोलले नाहीत. मात्र, सर्जरीचा अनुभव गाठीशी असावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलात सर्जरीचा अनुभव घेतला.
मार्च १९७४ मध्ये मी हेमलकशाला गेलो, तोपर्यंत बाबांनी पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदाने यायचं, असं ठरवलं होतं. (त्यामुळे ती नागपूरलाच राहिली. ती डिसेंबर १९७४ मध्ये नोकरी सोडून हेमलकशाला आली. )
हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणार्यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी, अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी.
मी हेमलकशाला पोहोचण्यापूर्वी बाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते तिथे पोहोचले होते. जगन मचकले, दादा पांचाळ हेही १९७४ सालीच आले. दादा पांचाळ हे सोमनाथच्या शिबिराला आले होते. तिथले काम बघून ते प्रभावित झाले आणि आपलं शिक्षण सोडून देऊन ते हेमलकशाला येऊन थांबले. जगन मचकले हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूपच प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला 'या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का' असं विचारल्यानंतर तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हेही होते. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला होता. पाहता पाहता एक चांगली टीम त्यातून आकारत गेली.
सुरुवातीला आमचा मुक्काम झाडाखालीच होता. पण झाडाखाली तरी किती दिवस राहणार? त्यामुळे राहण्यासाठी काही तरी सोय करायला हवी होती. मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. जंगलाच्या मध्यभागी झोपडी बांधणं हे कठीणच काम होतं. पण आधी थोडी झाडं तोडून आसपासचा भाग साफसूफ केल्यानंतर झोपडी बांधता आली. या झोपडीमुळे डोक्यावर किमान छप्पर तरी आलं. आम्ही कार्यकर्ते संख्येने थोडेसेच असल्याने सगळे एका झोपडीत राहू शकायचो. पण पुढे मंदा आल्यावर झोपडी अपुरी पडायला लागली. मग ती मोठी केली. इतरही एक-दोन झोपड्या तिथे बांधल्या. हेमलकशाला काम सुरू करायचं, हा हेतू मनाशी धरून आम्ही दहा-बाराजण बाबांबरोबर तिथे आलो होतो हे खरे; पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की इथे अक्षरशः शून्यातून काहीतरी निर्माण करायचं होतं. काम करण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी कोणतीही सुविधा तिथे नव्हती. आम्ही थोडासा शिधा बरोबर घेऊन गेलो होतो. तेवढंच काय ते आमच्यापाशी होतं. राहण्यासाठीची किमान व्यवस्था उभारणं, पाण्याची सोय करणं, या गोष्टी केल्यानंतरच खरं काम सुरू होणार होतं. आधी स्वतःचं थोडं बस्तान बसवणं आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेणं आमच्यासाठी आवश्यक होतं.
डोक्यावर छप्पर उभारण्याबरोबरच पाण्याची सोय करण्यावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं. आम्ही जिथे आमचा मुक्काम ठोकला होता तिथे शेजारीच एक नाला होता. या स्रोतातून पाणी मिळवण्याच्या भूमिकेतून आम्ही त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच! ते पाणी आम्ही पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. त्यामुळे बैलगाडीत ड्रम टाकून फेर्या करायचो. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. कारण नीट राहायला जिथे जागा नाही तिथे अंघोळीला बंदिस्त जागा कुठून असणार? सुरुवातीला टॉयलेट्सचीही सोय नव्हती. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती. मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.
अशा परिस्थितीत राहणं हे काही दिवसांसाठी ठीक होतं; पण एकेक करून एकेक काम हाती घेणं आणि ज्या हेतूने आम्ही इथे आलो होतो त्या आरोग्यसेवेला सुरुवात करणं आवश्यक होतं. हे काम करायचं तर त्याला मनुष्यबळ हवं. आम्ही मोजकेच कार्यकर्ते होतो. बाबांनी या गोष्टीचा आधीच विचार केलेला होता. कुष्ठरोगावर उपचार घेऊन बर्या झालेल्या आनंदवनातील काही कुष्ठरोग्यांना त्यांनी प्रकल्पावर आणलं. हे सगळे बरे झाले असले तरी त्यांचं कुटुंब, समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हता. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, असा बाबांसमोर प्रश्न होता. कुष्ठरोग्यांना निव्वळ बरं करणं, एवढाच मर्यादित हेतू त्यांच्यासमोर नव्हता. त्यांना आत्मविश्वास परत मिळवून देणं, हे बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. कुष्ठमुक्त होऊनही आपल्याला लोक स्वीकारत नाहीत म्हटल्यावर त्या माणसाला वैफल्य येण्याची शक्यता होती. तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम त्याला शिकवलं. त्यामुळे हे सगळे कुष्ठरोगी शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा करणं, अशा कामांमध्ये गुंतले गेले. आपल्याला समाज स्वीकारत नाही, याचं दु:खही त्यातून कमी होण्यास मदत झाली. शंकरदादा नावाचे एक बाबांचे सहकारी होते. बाबांचा जणू उजवा हातच! तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस मोठा कर्तबगार. त्यांनी पुढे सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा किती तरी जणांत 'आपण खूप काही करू शकतो' हा विश्वास निर्माण केला.
असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकशालाही आणले. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, या कष्टाच्या कामांत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. आम्ही त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. आनंदवनात माळरानावर वसाहत उभी राहिली तेव्हा मी लहान होतो. आता तेच काम इथे जंगलात करताना आनंदवनाच्या उभारणीमागील कष्ट जाणवत होते. झाडं तोडताना, दगड फोडताना हात भरून यायचे; पण आपण काही तरी नवीन निर्माण करतोय याचा आनंदही व्हायचा.
काही दिवसांच्या सतत परिश्रमांनंतर थोडी मोकळी जागा तयार झाली. त्यात आमच्या झोपडीप्रमाणेच कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेड तयार केली.
याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला आणखी एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्मही बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. अशा रीतीने किमान काही एक व्यवस्था उभी राहू लागली. 'विहिरी'मुळे पाण्याची थोडीफार सोय झाली. आमच्यासाठी एवढ्या सोई खूप होत्या. शिवाय आम्ही जंगलाला आमचं घर मानलं होतं, कारण कोणता वन्य प्राणी आमच्यासमोर कसा आणि कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील याचा नेम नव्हता. पण त्यांच्यासह जगायला आम्ही शिकलो आणि पाहता पाहता हेमलकशातील आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.