फसणवीस सरकार बहुजन समाजाची दिशाभूल करीत आहे.....सचिन साठे
पिंपरी - ( सह्याद्री बुलेटीन ) फसणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. महाराष्ट्रातील तमाम जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली. भाजपला सत्ता मिळून चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने 2013 लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आता देवेंद्र फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आमदार राजीनामा देण्याचे धाडस करीत असताना, बिल्डरांच्या भल्यासाठी, बैलगाडा शर्यतीसाठी राजीनामा देऊ म्हणणारे पिंपरी चिंचवड मधील खासदार, आमदार याविषयावर मुग गिळून गप्प बसले आहे ही शोकांतिका आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी येथे केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब पुतळा चौकात गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद निमित्त झालेल्या ठिय्या आंदोलनात मार्गदर्शन करताना साठे बोलत होते. -------------------------