दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये - शिवसेनेने केली अरुण जेटलींनी पाठराखण

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? विजय मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जेटलींनी पाठराखण केली आहे. एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात सांगितले की, ‘‘बँकांचे आपल्यावर कर्ज होते. थकबाकी भरायला आपण तयार होतो. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकदा पत्र लिहिले होते, परंतु मला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकांशी तडजोड करावी यासाठी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.’’ मल्ल्याच्या या विधानानंतर इतकी खळबळ उडायचे कारण काय? अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे. ज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

 

Review