रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, ही स्थिती बघून आज लाजेलाही लाज वाटेल - रामदेवबाबांचा मोदी सरकारवर निशाणा

रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे,रुपयाची ही स्थिती बघून आज लाजेलाही लाज वाटेल. राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकास दर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल?.रुपयाच्या तीव्र ऱ्हासामुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी यावरुन केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
योगगुरु रामदेवबाबा यांनी शनिवारी खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.त्या वेळी ते बोलत होते.

देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेक जण आरोपीच्या पिंजऱ्यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला, नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकांमुळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी राजकारणाला गांभीर्याने घेत असून ते हल्ली मेहनत करताना दिसत आहेत. माझा राहुल गांधींवर वैयक्तिक राग नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Review