माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे निधन

चंद्रपूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे रविवारी दुपारी ३.२३ वाजता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
८५ वर्षीय शांताराम पोटदुखे यांना सोमवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पोहचताच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा भरत, मुलगी भारती (रिमा) चवरे, स्नुषा रमा गोळवलकर-पोटदुखे, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे.
३० जानेवारी १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. बी.ए. आणि बी.जे.पर्यंत शिक्षण झाले. विदर्भातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघटनांचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची प्रमुख घटक संस्था विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त होते. १९८० पासून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अधिराज्य गाजविले. या काळात त्यांनी जनतेशी कधीही नाळ तुटू दिली नाही. जनतेनेही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच १९८०-१९८४, १९८४-९८, १९८९-१९९१ व १९९१-१९९६ असे सलग चारवेळा ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. चौथ्यांदा ते खासदार झाले तेव्हा त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव बघता, त्यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. चंद्रपूरच्या राजकारणाचा दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. राजकारणात त्यांना कधीही विरोधकांवर आरोप करताना बघितले नाही. उलट विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांची त्यांनी स्तुतीच केली. सुधीर मुनगंटीवार हे आमदार असताना एकाच मंचावर एकत्र आले असता त्यांनी मुनगंटीवार यांचे जाहीर कौतुक केल्याचेही सर्वश्रुत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते शिक्षण घेत असताना त्या काळात चंद्रपुरात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे नागपूरशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यांचे मित्र हुशार असतानाही गरिबीमुळे नागपूरला उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. ही खंत त्यांच्या मनात कायमची घर करून होती. तेव्हापासूनच त्यांनी चंद्रपूरसह ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करण्याची खूणगाठ बांधली. सर्वप्रथम नेहरू विद्यालय सुरू केले. यापाठोपाठ सर्वोदय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरदार पटेल महाविद्यालय सुरू केले. विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मॅनेजमेंट, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची सोय चंद्रपुरात उपलब्ध करून दिली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आजघडीला सहा शाळा व पाच महाविद्यालये आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठ्या हुद्यावर पोहचली आहे. त्यांनी राजकारणात आणलेले समाजकारण आणि आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यात केलेली शैक्षणिक क्रांती कधीही विसरू न शकणारी आहे. साहित्य क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यांनी २०१२ मध्ये चंद्रपूर येथे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविले होते. हे संमेलन चंद्रपूरसह विदर्भातील साहित्य क्षेत्रासाठी मेजवानीच होती. राजकारणात राहूनही साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेली भरीव कामगिरी सुवर्ण अक्षरात नोंद करणारी अशीच आहे. असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी निघून गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

Review