४१ दिवसापासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाही .
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- बेवारस मृतदेहांवर तीन दिवसांत पोलिसांनी अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे. मात्र भोसरी पोलिसांनी तब्बल ४१ दिवसांनंतरही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता एक प्रकारे विटंबनाच केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्यातील हवालदार आनंद भोरखडे यांनी १३ नोव्हेंबर रोजी २८ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह वायसीएमच्या शवागृहात आणून ठेवला. मात्र ४१ दिवसानंतर अद्यापही या मृतदेहावर अंत्यसस्कार केलेले नाहीत.
त्यानंतर याच पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक के.एन.करे यांनी ५ डिसेंबर रोजी ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह शवागृहात आणून ठेवला आहे. त्याच्यावर १९ दिवसांनंतरही अंत्यसंस्कार केलेले नाहीत.
भोसरी पोलिस ठाण्यातीलच पोलिस नाईक उमेश देवकर यांनी १० डिसेंबर रोजी ३७ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह वायसीएममधील शवागृहामध्ये ठेवण्यासाठी आणला होता. मात्र १४ दिवसांनंतरही या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत.
पोलिस कर्मचाऱ्यांनी जरी मृतदेह वायसीएमच्या शवागृहांमध्ये ठेवला असला तरी याबाबतचा तपास अधिकाऱ्यांकडे असतो. याशिवाय वरिष्ठ अधिकारी देखील यावर लक्ष ठेवत असतात. यामुळे या घटनेस जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.