पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती नकोच;केजरीवालांचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. आता २०१९ मधील निवडणुकीत जनतेने ही चूक सुधारावी. आता एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्यावी, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दिल्लीत बुधवारी अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांच्या सभेतून भाजपा आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केले. केजरीवाल म्हणाले, गेल्यावेळी तुम्ही १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. यंदा या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. १२ वी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत पार पडलेल्या या सभेत ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्हणाले, १४ एप्रिल २०११ रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून हटवले होते. त्याच पद्धदतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखाडून फेकणार, असे त्यांनी सांगितले.
राफेल करारावरुनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या काळातील राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार आहेत, असा आरोप केजरीवालांनी केला. राफेल करारातील सत्य बाहेर आल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केजरीवालांनी भाषणात ममता बॅनर्जींचेही कौतुक केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने सीबीआयच्या कारवाईवरुन टक्कर दिली ते कौतुकास्पदच आहे. पश्चिम बंगालमध्ये जनतेने निवडून दिलेले सरकार आहे आणि केंद्र सरकारने या सरकारवरच हल्ला केला होता. जर पोलीस आयुक्तांना अटक झाली असती तर सर्व राज्यांमध्ये केंद्र सरकारपासून घाबरुन रहा, असा चुकीचा संदेश गेला असता, असेही त्यांनी सांगितले.