'स्वतः च्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले'?,ना 'लक्ष' ना 'मन', त्रस्त जनता जनार्धन'- ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे फलक
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- भाजप सरकाराला साडेचार वर्ष पूर्ण झाले. तरी, देखील पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न सुटले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड परिसरात फलकबाजी करण्यात आली आहे. यामाध्यमातून सरकारचे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. 'स्वतः च्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले'?, ना 'लक्ष' ना 'मन', त्रस्त जनता जनार्धन' असा मजकूर फलकांवर लिहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी हे फलक लावले आहेत.

पिंपरी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड, रहाटनी, चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसरात फलक लावण्यात आले आहे. "पिंपरी-चिंचवडकर विचारतायं रेड झोनचा प्रश्न अजूनही लाल फितीत कसा?, "रिंग टेंडर काढणारे ठेकेदार, जनतेच्या पैशाची थांबवा लूटमार", "पारदर्शकतेचा प्रचार जोरात अन् नातेवाईकांना टेंडरची खैरात", "पार्लमेंट ते पालिका सत्ता तुमच्याच हाती, मग का मंदावली शहर विकासाची गती", "शहराला लागला गुन्हेगारीचा फास, मिटले नाही भय भिती चोवीस तास",

"हक्काचे घर त्रासापासून कधी सुटणार, अनधिकृतचा प्रश्न सांगा कधी मिटणार", "ढिसाळ नियोजनापायी नशिबी येणार पाणी टंचाई", "गॅस, लाईट बिल, किराणा, शिक्षण भाज्या, पेट्रोल महागले", "अच्छे दिनंच काय केल?, 'जगणं इतंक महाक का झाल?, "स्वतः च्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले'?, ना 'लक्ष' ना 'मन', त्रस्त जनता जनार्धन' असा मजकूर फलकांवर लिहिला आहे. थेट जाब विचारणारे प्रश्न जाहिराती फलकाच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत.
याबाबत बोलताना नाना काटे म्हणाले, "भाजपने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली होती. पंरतु, केंद्रातील सत्तेचा कार्यकाळ संपत आला. तर, राज्यातील सत्तेला साडेचार वर्ष पुर्ण झाली आहेत. तरीही, दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता आला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वसामान्य नागरिकांची भाजप सरकारने फसवणूक केली आहे. फसवी कर्जमाफी, हमीभाव ही घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. भाजपने केवळ 'गाजर' दाखविण्याचे काम केले आहे. जनतेचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार सुरु आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी फलक लावले असल्याचे" काटे यांनी सांगितले.