
Lok sabha 2019: सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू; निवडणूक आयोग करणार पडताळणी
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन) देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक २०१९च्या तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता लागू झाल्याची घोषणादेखील केली. विशेष म्हणजे , इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील जाहिरातींची निवडणूक आयोग पडताळणी करणार आहे. सोशल मीडियामध्ये जाहिरात पोस्ट करताना राजकीय पक्षांना याबाबत निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.
गुगल आणि फेसबुकलाही जाहिराती ओळखून याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय खोट्या बातम्या आणि तणाव निर्माण करणाऱ्या भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाज माध्यम स्तरावर अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे. सर्वसामान्य जनता आणि राजकीय पक्षांसाठी काही मोबाईल अॅप्स आणि डिजिटल पोर्टल्सची माहितीही यावेळी देण्यात आली. आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास ती घटना रेकॉर्ड करून आयोगाने तयार केलेल्या अॅपवर पाठवावी आणि तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल , असेही निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. दिव्यांगासाठीही विशेष अॅप लॉन्च करण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली.