तरूण सागर महाराजांचे निधन...

(सह्याद्री बुलेटीन) - कडवे प्रवचनकार, जैन मुनी तरूण सागर महाराजांचे दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं आहे. ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तरूण सागर महाराज यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त जमण्यास सुरूवात झाली आहे. आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं

तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.

Review