
पुण्यात कार चालकाचा खून: दरोडेखोर टोळी अटक!
आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
कारचालकाचा खून करणारी टोळी जेरबंद; प्रवासाच्या बहाण्याने बसले होते कारमध्ये
पुणे: शेअर कार बुक केल्यानंतर चालकाचाच खून करून त्याचा मृतदेह कसारा घाटात टाकून पसार झालेल्या आंतरजिल्हा दरोडा टाकणार्या टोळीला अखेर आळेफाटा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपींना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
विशाल आनंद चव्हाण (वय 22), मयूर विजय सोळसे (वय 23) आणि ऋतुराज विजय सोनवणे (वय 21) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. तर कारचालक राजेश बाबूराव गायकवाड (वय 56) यांचा आरोपींनी खून केला. 27 जानेवारी रोजी खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्यात राजेश यांचा मुलगा अंकुश गायकवाड (वय 30) याने फिर्याद दिली होती.
घटनेचा तपशील
कारचालक राजेश गायकवाड हे 27 जानेवारी रोजी त्यांच्या ताब्यातील इर्टिगा कार घेऊन पुण्याला आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या आईच्या मोबाईलवर एकाने फोन करून त्यांचा मोबाईल पुणे-नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर शोध घेऊनही राजेश न सापडल्याने 28 जानेवारी रोजी त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास संतवाडी परिसरात राजेश यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक तपास सुरू केला.
असा लागला खुनाचा छडा
संबंधित कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिककडे जाताना दिसली. त्यावेळी कारमध्ये राजेश यांच्याव्यतिरिक्त अन्य तीन व्यक्ती बसलेले आढळले. त्यानंतर संबंधित कार कसारा घाटात सापडली. यामुळे आरोपी नाशिकचे असावेत, अशा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांना बातमीदाराकडून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कारमधील संबंधित व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे व विशाल आनंदा चव्हाण असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. 31 जानेवारी रोजी पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गुन्हा करण्यासाठी कल्याणकडून ओतूरच्या दिशेने येत आहेत. त्यानंतर पोलिसांनी माळशेज घाटाजवळ सापळा लावून विशाल चव्हाण, मयूर सोळसे आणि ऋतुराज सोनवणे यांना पकडले.
आरोपींची कबुली
आरोपींनी चौकशीत नाशिकला जाण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये बसलो आणि आळेफाट्याजवळ राजेश गायकवाड यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह टाकून कार घेऊन निघून गेल्याचे सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
या टोळीने यापूर्वीही गंभीर गुन्हे केले आहेत. पोलिस तपासात समोर आले आहे की, युवराज मोहन शिंदे याने यापूर्वी देखील अशाप्रकारे गुन्हे केले असून, चाकण परिसरात देखील एक कार जबरदस्तीने चोरून नेली होती. आरोपींवर गंगापूर (नाशिक) मध्ये खून, मालमत्ता चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्वेलर्सवर दरोड्याचा कट
पोलिस तपासात समोर आले की, आरोपी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. या दरोड्यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर गुन्हा करायचा नव्हता, मात्र, मारहाणीत राजेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी नाशिककडे पळ काढला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, एपीआय अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.